पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड मिळून एकूण आठ “बीआरटी’ मार्ग आहेत. एकीकडे “बीआरटी’ला विरोध होत असला तरी गतिमान बससेवेसाठी बीआरटी असणे गरजेचे असल्याचे तसेच या मार्गावरील उत्पन्न चांगले असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केलेला आहे, अशा स्थितीत पुणे-नगर महामार्गावरील येरवडा-रामवाडी दरम्यान तीन किमी बीआरटी मार्ग काढण्यात येत असल्याची माहितीच पीएमपी प्रशासनाला नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. यासंदर्भात पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
नगर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीस बीआरटी मार्ग कारणीभूत ठरत असल्याचा दावा करीत सदर ठिकाणी बीआरटी मार्ग काढण्याची मागणी आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी लावून धरली होती. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांच्या समितीने या मार्गाची पाहणी केली होती, त्यानुसार सदर मार्गावर सुरवातीच्या टप्यात येरवडा ते रामवाडी दरम्यानचा बीआरटी मार्ग काढण्याचे निश्चित झाले. मात्र, सदर मार्ग काढण्याबाबत पीएमपी प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आली आहे, थेट मार्ग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तर, याबाबत कल्पना देऊनच काम सुरू केल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. बीआरटी मार्ग काढल्याचा परिणाम प्रवासी सेवेवर होणार आहे. नगर मार्गावरून दररोज पीएमपीच्या सुमारे 125 बसेसच्या माध्यमातून 1,500 फेऱ्या होतात. यातून सुमारे एक लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. आता, तीन किमीच्या रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढण्यात आल्याने बसचा वेग कमी होणार आहे.
नगर महामार्गावरील बीआरटी मार्ग काढण्यात येत असताना दिघी-आळंदी बीआरटी मार्ग नुकताच सुरू झाला आहे, त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा मार्ग पीएमपीसाठी फायदेशीर ठरत आहे. दिघी-आळंदी मार्गावरून दररोज सुमारे 89 हजार प्रवासी प्रवास करतात यातून दिवसाला सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळते. उत्पन्नाच्या बाबतीत हा मार्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे. नगर महामार्गावरील मार्ग काढण्यापेक्षा अडचणींवर उपाय शोधता आले असते. प्रवाशांच्यादृष्टीने बीआरटी सेवा जास्त फायदेशीर आहे. त्याचा विस्तार होणे गरजेचे आहे, असे पीएमपी बीआरटीचे प्रमुख अनंत वाघमारे म्हणाले.