प्रा. शुभांगी कुलकर्णी
आपल्या जीवनात इंटरनेटचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. मुलांना इंटरनेट, ऑनलाइन गेमची चटक लागली असून त्याच्यापासून परावृत्त कसे करावे, यावरून पालक चिंतेत आहेत. सध्याच्या चाळीशी-पन्नाशीतील व्यक्तींचे बालपण अतिशय वेगळे होते आणि ते बालपण आजच्या मुलांनी जगावे, अशी पालकांची मनोमन इच्छा आहे.
सध्या घराघरातील संवाद हरवत चालला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वात मोठी चिंता म्हणजे लहान मुले आणि वयस्कर लोक मोबाइल आणि संगणकावर अधिकाधिक काळ व्यतित करत आहेत. लॉकडाऊन आणि करोना काळात घरात असलेली मंडळी ही मोबाइलने मानसिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर गेली आहे. इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे काही जण कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांतील सहभागी होण्यास टाळाटाळ करत आहेत.
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यात एका भावाने मोबाइलसाठी आपल्या पंधरा वर्षांच्या बहिणीची हत्या केली. यामागचे कारण म्हणजे आरोपीने आपल्या मामाच्या घरातून मोबाइल चोरुन आणला होता आणि त्या चोरीला बहिणीने विरोध केला. दुसऱ्या घटनेत दिल्लीच्या किशनगड भागात ऑक्टोबर 2018 या काळात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या झाली. या घटनेचा सूत्रधार 19 वर्षांचा मुलगा निघाला. पालकाने आणि बहिणीने त्याला ऑनलाइनवर गेम खेळण्यास मज्जाव केल्याने त्याच्या मनात राग खदखदत होता. अशा एक दोन घटना पाहता मोबाइलचे वेड किती थराला पोचले आहे, याचे आकलन होते.
गेल्या काही वर्षांत मुलांत ऑनलाइन गेम खेळण्याचे वेड प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहे. बहुतांश ऑनलाइन गेम हे हिंसेवर आधारित आहेत आणि युवक-मुलांना आभासी जगात घेऊन जात आहेत. एकंदरित मुलांपासून वयस्कर मंडळीपर्यंत मोबाइलचा अतिवापर हे एक आव्हान बनत चालले आहे. यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयाला इंटरनेटच्या आहारी गेलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू करावे लागले आहे.
आपल्या जीवनात इंटरनेटचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. मुलांना इंटरनेट, ऑनलाइन गेमची चटक लागली असून त्याच्यापासून परावृत्त कसे करावे, यावरून पालक चिंतेत आहेत. सध्याच्या चाळीशी-पन्नाशीतील व्यक्तींचे बालपण अतिशय वेगळे होते आणि ते बालपण आजच्या मुलांनी जगावे, अशी पालकांची मनोमन इच्छा आहे. तत्कालिन काळात एका कॉलनीत एक टीव्ही असायचा. 1980 च्या दशकातील कॉलेजकुमार दूरदर्शनवरील बातम्या, चित्रहार, क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी हॉस्टेलच्या कॉमन रुममध्ये जात असत.
सकाळी लवकर उठणे हे विद्यार्थ्याचे लक्षण मानले जात होते. आता उशिरा झोपणे आणि उशिरापर्यंत उठणे ही बाब सर्वसाधारण होत चालली आहे. या जीवनशैलीची सुरुवात ही टीव्ही आल्यानंतर काही काळातच झाली. टीव्हीचे जबरदस्त आकर्षण असल्याने गावातील तरुण मंडळी रात्री उशिरापर्यंत टीव्हीवरच्या मालिका, सिनेमा आणि क्रिकेटचा सामना पाहत असत. परिणामी सकाळी लवकर उठण्याची परंपरा खंडित झाली.
नव्या डिजिटलच्या वातावरणात विद्यार्थ्यांची प्रतिमा आणि दिनक्रम बदलला आहे. आजच्या पालकांना वाटते की मुलांनी आपल्याप्रमाणे जगावे. पण ही बाब अपवादाने दिसून येऊ लागली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक आणि संस्कृती समाजाचे चित्र बदलत असून ते मल्टीफंक्शनल (बहुआयामी) झाले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील राहणीमान, विचाराची माहिती ही इंटरनेटमधून मुलांपर्यंत काही वेळातच पोचत आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या समाजापासून मुले कसे वेगळे राहू शकतील, हा एक प्रश्न आहे.
काही पालक पाल्यांच्या सोशल मीडिया अकाउंटपासून त्याच्या ऑनलाइन वर्गावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या पाल्यांनी आपल्यासमोरच टीव्ही पाहावा, संगणकावर काम करावे, मोबाइलवर खेळावे असा दंडक काही पालकांचा असतो. यामुळे आपण एक आदर्श पालक ठरू, असा त्यांचा समज असतो. परंतु इंटरनेटवर नियंत्रणासाठी ही बाब पुरेशी आहे का? करोना काळात इंटरनेटचे महत्त्व वाढत गेले आणि आता तरुण पिढीसाठी मोबाइल, संगणक, इंटरनेट, टॅबलेट या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत. प्रत्यक्षात डिजिटल माध्यमांचा हस्तक्षेप आपल्या दैनंदिन कारभारात होत आहे.
सुरुवातीच्या काळात ड्रॉंइंग रुमध्ये असलेला टीव्ही आता बेडरुममध्ये पोचला आहे. एकाच घरात संगणक, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाइल माध्यम उपलब्ध होत आहेत. अशावेळी मुलांना ऑनलाइन गेम, सोशल मीडिया, यूट्यूब, पॉडकास्ट, इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मपासून कसे रोखता येईल.
इंटरनेटच्या माध्यमातून आजचा युवक जगभरात सहजपणे पोचत आहे. त्यांच्याकडे माहितीचा खजिना आहे. आता ते मागे राहू शकत नाहीत आणि वेळोवेळी अपडेट होत आहेत. अर्थात, पालकांनी मुलांकडील उपलब्ध माहितीच्या आधारे संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा. मुलांचा स्क्रीन टाइम हा कमीच राहावा, यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत.
मात्र पालकांनीच स्वत:चे मोबाइल प्रेम कमी करायला हवे. पालकच चोवीस तास मोबाइल हातात घेऊन बसले तर मुलांना ते यापासून कसे परावृत्त करतील, असा प्रश्न आहे. क्रीडा, भटकंती यासारख्या गोष्टीतून आठवड्यातून एक दिवस गॅझेटशिवाय राहण्याचा प्रयत्न करायला हवा. अशा प्रयत्नांतून संवाद आणि अनौपचारिकता वाढू शकते. यासाठी पालकांना वेळ काढणे गरजेचे आहे. इंटरनेट हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. दीर्घकाळ आपण इंटरनेटच्या दुनियेवर अंकुश ठेवू शकत नाही. त्याच्याशी ताळमेळ बसवणे हाच एक मध्यमार्ग आहे.