शर्मिला जगताप
अठराव्या शतकात शिवगंगा राज्याची राणी वेलू नचियार तामिळनाडूमध्ये “वीरमंगई’ या नावानेही ओळखली जाते. वेलू नचियार रामनाथपूरम राज्याची राजकुमारी तसेच रामनाथ साम्राज्याचे राजा चेल्लामुतहू विजयाराघूनाथ सेतुपति आणि राणी सक्धिमथुल सेतुपतिची एकुलती एक होती. तिचे पालनपोषण राजकुमारासारखेच केले गेले.
तिला लहानपणीच घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजीसोबत विविध भाषा, ज्यात फ्रेंच, इंग्रजी आणि उर्दू भाषांचे प्रामुख्याने शिक्षण देण्यात आले. तिचा विवाह शिवगंगाचे राजा मुथुवादुग्नाथापेरिया उदायियाथेवर याच्यासोबत झाला.
इंग्रजांनी अरकोटच्या नवाबासोबत हात मिळवून तिच्या पतीची हत्या केली होती, त्यामुळे राणीला आपल्या दत्तक मुलीला सोबत घेऊन अनेक वर्षे डुंडीगलजवळ वीरुपच्ची येथे हैदर अली याच्या आश्रयात राहावे लागले. या कालावधीत राणीने आपले एक सैन्य तयार केले. गोपाल नायकर व हैदर अली यांच्या सोबत इंग्रजांविरुद्ध राणीने लढाई उभी केली.
1780 साली वेलू नचियारने इंग्रजांसमोर कडवे आव्हान निर्माण केले. तिने पहिल्यांदा मानवीबॉम्ब बनविल्याचे मानले जाते. राणीला जेव्हा इंग्रजांच्या दारूगोळाच्या ठिकाणाची माहिती मिळाली तेव्हा एक विश्वासू सेविका क्युइली हिला तो दारूगोळा नष्ट करण्याचा आदेश दिला. या सेविकेने स्वतःला आग लावून हा दारूगोळा उडवून दिला. यात तिचाही प्राण गेला.
राणी वेलू नचियारच्या दत्तक मुलीला इंग्रजांसोबत लढताना वीरमरण आले. राणीने मुलीच्या आठवणीकरीता एक सुसज्य महिला सैन्य तैनात केले. राणीने जवळपास 10 वर्षे राज्य केले. 1796 साली आजारामुळे राणीचा मृत्यू झाला. 1857 च्या उठावाला पहिला स्वातंत्र्य लढा मानला जातो. मात्र त्यापूर्वीच राणी वेलू नचियारने इंग्रजांना मात दिली होती. मात्र इतिहासाच्या सुवर्ण पानावर तिचे नाव कोरले गेले नाही, हे दुर्दैव.