वृद्धांना पूर्वी इतका सन्मान मिळत नाही
ज्यांनी आयुष्याचे अर्धशतक गाठले आहे त्या सगळ्यांनीच आपल्या लहानपणातील शिस्तबद्ध आयुष्य आठवले तर लक्षात येते की आपले आयुष्य संस्कारमय घडले. कारण घरात आजूबाजूला अनुभवाने परिपक्व असलेले आजी आजोबा होते. ज्यांच्याबद्दल भीतीयुक्त आदर मनात होता. त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांचा शब्द प्रमाण होता. म्हणजेच त्यावेळच्या म्हणजे अगदी गेल्या वीस-तीस वर्षांपर्यंत वृद्धांना समाजात सन्मानाची वागणूक मिळत होती. पण जसं शहरीकरणाचा ओघ वाढत गेला. सिमेंटची जंगलं वाढली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी आजी-आजोबांच्या नावावर असलेल्या जमिनी जुमलांचे हस्तांतरण मुलांच्या नावावर होत असे, पण शिक्षण नोकरीमुळे मुलांची नाळ जमिनीशी तुटली. संसारात विभक्त कुटुंब पद्धती आली आणि मन पण विभक्त झाले. भीतीयुक्त आदराची जागा लुडबुड या शब्दाने घेतली आणि मोठ्यांना मिळणारा सन्मान कमी झाला. जे आता ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांनी त्यांच्या कामानिमित्त गाव आई-वडील सोडले, तेव्हाच त्यांच्या मुलांनी त्यांना सोडणं हे विधिलिखित झाले! हे वक्तव्य वादग्रस्त असेलही त्यांची अजूनही काही सामाजिक कारणे असतीलही पण आता वृद्धांना समाजात सन्मान मिळत नाही हे सत्य आपण नाकारू शकत नाही.
शहरी भागातल्या आधुनिक वृद्धांच्या काही धारणासुद्धा हा सन्मान न मिळण्यासाठी जबाबदार आहेत. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीने रिटायर होण्याच्या काळात तिच्या मुलाला आणि सुनेला असे बजावून टाकले की कोणतेही काम बसल्या जागेवर एवढं करून घेता का? किंवा बसल्यावर आई तुम्ही तेवढं करून घ्याल का? असं म्हणून मला सांगायचे नाही. मी ते करणार नाही! आणि तुम्हाला जर मुले होऊ द्यायची असतील तर त्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर टाकायची नाही. असे तिने निक्षून सांगितले होते! आता बघा हीच मैत्रीण पंधरा-वीस वर्षांनंतर जास्तच वृद्ध होईल. एखाद्या वेळेला जर ती बेडरिडन झाली तिला तो सन्मान मिळेल का? किंवा तिला त्या सन्मानाने वागवावे असं कोणत्या सुनेला, मुलाला वाटेल? म्हाताऱ्या लोकांनी तरुणांच्या संसारात “लुडबुड’ न करता सपोर्टिव्ह रोल देणं जेव्हापासून बंद झाले तेव्हापासून हा सन्मान न मिळण्याची शक्यता निर्माण झाली असावी.
याचाच एक अर्थ असाही आहे. कोणत्याही पद्धतीने वृद्धांनी जर आपण इतरांकरता उपयुक्त राहू असे कसोशीने पाळायचे ठरवले तर किंवा बऱ्यापैकी प्रॉपर्टी पैसा अडका आपल्याच नावावर राखून ठेवला असेल तर त्यांचा सन्मान निदान तोंड देखला का होईना, राखला जाण्याची शक्यता असते. दुसऱ्या बाजूला जर यातील काहीच घडत नसेल तर तरुणांची वृत्ती अशा पद्धतीच्या वृद्धांना सन्मान देण्यापेक्षा त्यांची हेटाळणी करण्याकडे झुकताना दिसते.
मुलांच्या संसारात वृद्धांचे स्थान काय?
स्त्रियांची आयुर्मर्यादा किंवा सरासरी वय आताच्या घडीला 71.5 दशांश तर पुरुषांचे सरासरी वय किंवा आयुर्मर्यादा 68 वर्षे इतकी आहे. म्हणजेच यापुढे समाजामध्ये पुरुष पत्नी हयात असतानाच मृत्यू पावतील किंवा पावत असावेत आणि स्त्रिया मात्र आपल्या नवऱ्याच्या माघारी एकट्या राहात असाव्यात. म्हणजे एकट्या राहणाऱ्या वृद्धांमध्ये स्त्रियांची संख्या यापुढे जास्त असेल.
स्त्रियांना मुलांच्या संसारात दुय्यम स्थान स्वीकारायला त्यांना जड जात नाही नसावं पण वृद्ध झालेले पुरुष आणि स्त्री दोघेही आपल्या मुलाच्या संसारात असतील तर स्त्रियांची उपयुक्तता कुटुंबाच्या दृष्टीने जास्त असते. स्त्रिया स्वयंपाक घरातील छोटी छोटी काम म्हणजे भाज्या निवडणे, धान्य निवडणे, स्वयंपाकात कुकर लावणे असा हातभार किंवा नातवंडांचा अभ्यास घेणं, त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणं, नातवंडांशी जुळवून घेणं अशा गोष्टीत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आघाडीवर असतात. त्या मानाने मुलांच्या संसारातील दुय्यम स्थान पुरुषांना स्वीकारायला जड जाते.
आयुष्यभर स्वतःचे निर्णय स्वतः घेत वाघासारखे जगलेल्या पुरुषाला कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीच शेवटी ही जागा दाखवत असावी. आता मुलाच्या संसारात दुय्यम स्थान घेऊन, त्याने घेतलेल्या निर्णयाला प्रमाण मानून जे काय पडेल ते काम मुलाच्या संसारात करत राहणे असे पुरुषांना सहसा झेपत नाही. त्यामुळे पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त एकटे होत जातात. एकटेपणाची भावना वाढत राहते. यामुळे पुरुषांना नैराश्य येण्याचा संभव स्त्रियांपेक्षा जास्त असतो. तसेच घरातील आजारी व्यक्तीची काळजी घेणं ह्यातही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त उपयुक्त ठरतात असे दिसते. त्यामुळे एखाद्या विभक्त कुटुंबामध्ये आई आणि वडील असे दोघे वृद्ध असतील तर त्यांच्या मुलांना, सुनांना आणि बऱ्याचदा नातवंडानाही आजी आजोबांपेक्षा जास्त प्रिय असते! (क्रमशः) (भाग 1)