पेठ – महाविकास आघाडी सरकारने सरसकट दोन लाख रुपयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफी योजनेत जे नियमित कर्ज भरतात त्यांना फायदा होणार नसल्याने त्यांच्या रोषाचा सोसायटीचे सचिव, जिल्हा बॅंकेचे अधिकाऱ्यांना सामना करावा लागत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना यांनाही दोन लाख मदत देण्यात यावी, अशी मागणी सातगाव पठारावरील सर्व संस्थाच्या वतीने करण्यात आली आहे.
नियमित कर्ज भरणारे शेतकरी अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत असल्याने त्याबाबतचे निवेदन सातगाव पठारावरील सर्व संस्थाच्या वतीने विभागीय अधिकारी एल. बी. थोरात आणि विकास अधिकारी डी. आर. पारधी यांना पेठ (ता. आंबेगाव) येथे आले. विभागीय अधिकारी पेठ येथे नियमित तपासणीसाठी आले होते, त्यावेळी त्यांच्याकडे हे निवेदन सुपूर्त केले. तसेच या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री दिलीप वळसेपाटील यांनाही पाठवली आहे. याबाबतची माहिती अशी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली आहे.
मात्र, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. या सरकारने कर्जमाफीसाठी आधीच्या सरकारने टाकलेल्या जाचक अटी-शर्ती काढून टाकत, कोणत्याही कागदपत्रांशिवाय, विविध कार्यकारी सेवा संस्था व बॅंकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे कर्जमाफी थेट थकीत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे; मात्र नियमित नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या तरी कोणती योजना जाहीर न झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
त्यामुळे शासनाने नियमित कर्जे भरण्यासाठी सर्वांत पुढे असणाऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा. अन्यथा संस्था व बॅंका पुढील काळात अडचणीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी अध्यक्ष विनायक धुमाळ, रोहीदास नवले, सोपान नवले, दिलीप पवळे, सुखदेव बुट्टे, सचिव निघोजकर आणि पठारावरील सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.