मुंबई – शरद पवार यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवल्याचे आजही सांगितले जाते. मात्र, आता या गुपिताचा स्वतः शरद पवार यांनीच खुलासा केला आहे. मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर पूर्ण सरकार स्थापन केलं असतं.
असं अर्धवट काम केलं नसतं, असं भाष्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘शरद पवार सांगत आहेत, त्यामुळे ते सत्य असावं. भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होती. त्यामुळे यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला. अजित पवार यांना गाठा, असे उपक्रम त्यांचे सुरु होते. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती, हे मला माहिती होते. तेही आमच्याशी बोलले होते. त्या काळात आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नव्हतो.’
ते पुढे म्हणाले,’आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण कोणाशी बोलतो आहे. कोण कोणाला भेटायला जात आहे, त्या काळात आमच्यात अत्यंत पारदर्शकता होती. हे भाजपला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घ्यायला गेले तेव्हादेखील आमच्यात पारदर्शकता होती’