शनिवारपर्यंत निर्बंध दूर करण्यासाठी प्रयत्न
मुंबई : येस बॅंकेच्या ग्राहकांना 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही. मात्र या बॅंकेचे प्रशासन कामकाज पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असून शनिवार पर्यंत येस बॅंकेच्या कामकाजावरील निर्बंध दूर होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ग्राहकांना रक्कम काढण्यावर मर्यादा लागू राहणार नाहीत. येस बॅंकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांनी स्वतः ही बाब स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, आम्ही कामकाज सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत.
ग्राहकांनी कसलीही चिंता बाळगण्याचे कारण नाही. त्यांच्या ठेवी पूर्णतः सुरक्षित आहेत. येस बॅंकेच्या प्रशासनाला रिझर्व बॅंक आणि स्टेट बॅंकेचे पूर्ण सहकार्य आहे. आम्ही रिझर्व बॅंक आणि स्टेट बॅंकेच्या कायम संपर्कात आहोत असे कुमार यांनी सांगितले.
स्टेट बॅंक ही येस बॅंकेचे 49 टक्के भाग भांडवल घेणार आहे. त्या प्रमाणात स्टेट बॅंक आपले संचालक येस बॅंकेच्या संचालक मंडळावर नियुक्त करेल. निर्बंध उठविल्यानंतर सर्व ग्राहकांकडून बॅंकेतून सर्व ठेवी काढून घेण्याची शक्यता असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले असता प्रशांत कुमार यांनी सांगितले की ,आम्हाला या बाबीचा अंदाज आहे.
आम्ही या विषयावर विचारही केला आहे. मात्र भारतातील सर्वाधिक मोठी बॅंक असलेली स्टेट बॅंक, ही येस बॅंकेचे 49 टक्के भाग भांडवल विकत घेणार असल्यामुळे ग्राहकांना बॅंक अडचणीत येणार नाही याची खात्री पटेल.
त्यामुळे ठेवीदार सर्व ठेवी काढून घेणार नाहीत अशी आशा आम्हाला आहे, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीचे एक-दोन दिवस अनिश्चित वातावरण निर्माण झाल्यामुळे ग्र्राहकांनी शाखा वर आणि एटीएमवर गर्दी केली होती.
मात्र रिझर्व बॅंक निश्चितपणे येस बॅंकेला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता ही गर्दी कमी झाली आहे. येस बॅंकेचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विलीनीकरण होणार नाही
दरम्यान येस बॅंकेचे स्टेट बॅंकेत किंवा इतर बॅंकेत विलीनीकरण होण्याची शक्यता प्रशांत कुमार यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की स्टेट बॅंक फक्त 49 टक्के भाग भांडवल विकत घेणार आहे.
याचा अर्थ एस बॅंकेचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे. लवकरच निर्बंध रद्द केल्याची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवे संचालक मंडळ गठित केले जाईल. त्याचबरोबर बॅंकेचा ताळेबंद 14 मार्च रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर सर्व बाबी अधिक स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले.