भोपाळ – ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील मतभेदांमुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. सिंधिया यांना मानणारे सर्व कॉंग्रेस आमदार बंगळुरुमध्ये मुक्कामाला आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलणार अशी जोरदार चर्चा आहे.
माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांना या परिस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील सध्याचे राजकीय संकट हा कॉंग्रेसचा अंतर्गत विषय आहे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मला यावर काहीही बोलायचे नाही. सरकार पाडण्यामध्ये आम्हाला अजिबात रस नाही हे मी पहिल्यादिवशीच बोललो आहे. मध्य प्रदेशात कुठल्याही एका पक्षाकडे पूर्ण बहुमत नसून, पाठिंब्याने हे सरकार उभे आहे.