मंचर – वाचनाची बदलती माध्यमे सध्या संक्रमणावस्थेत आहेत. मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर वाचन वाढले पाहिजे. कारण वाचन संस्कृती ही माणसाला जगायला शिकविते. चांगले साहित्य संस्कार घडवितात, असे प्रतिपादन घोडेगाव न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एच. जे. पठाण यांनी केले.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत कायदा साक्षरता शिबिर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना न्यायाधीश ए. जे. पठाण बोलत होते. यावेळी घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश नितीन मेश्राम, ऍड. गायत्री काळे, ऍड. अनिल पोखरकर, ऍड. दीपक लोहोटे, ऍड. एस. जी. आर्वीकर, ऍड. निलेश शेळके, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, प्रशांत पाटील, विनोद भालेराव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड होते. न्यायाधीश नितीन मेश्राम म्हणाले, मानवी कृतीमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे आणि पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा पर्यावरणाच्या अवनतीमुळे सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
म्हणूनच मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरणाची गुणवत्ता राखणे काळाची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील यांनी “हवा विकणे आहे’ या विषयावर बोलताना वृक्ष लागवड व संवर्धनाची गरज विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिली.
ऍड. गायत्री काळे यांनी भाषणातून वाहतुकीच्या नियमांची गरज विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिली. प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले मातृभाषेतून आपल्या भावना आपणास सहजपणे व्यक्त करता येतात. आपला सांस्कृतिक वारसा जतन करता येतो. त्यासाठी आपली मातृभाषा संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. निलेश शेळके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार यांनी केले. तर संचिता मोढवे यांनी आभार मानले.