जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुसडगाव येथील जलजीवन योजनेचा चुकीचा सर्व्हे रद्द करून कार्यारंभ आदेश रद्द करावा. संपूर्ण गावाला या योजनेचा फायदा होईल, यासाठी सर्व्हे पुन्हा करावा; अन्यथा पंचायत समितीवर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा सरपंच व सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.
या वेळी माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांच्या मार्गदशनाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुसडगाव येथील भोगलवाडीसाठी काझेवाडी तलावावरून विहीर धरून त्या वाडीसाठी कायमस्वरूपी पाण्याची सुविधा होईल. भोगलवस्ती व लेकुरवाळे वस्ती याठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 20 ते 25 हजार लिटरची स्वतंत्र टाकीची आवश्यकता आहे. कुसडगावसाठी काझेवाडी तलावामधून स्वतंत्र विहीर व 80 हजार लिटरच्या टाकीची आवश्यकता आहे. याबाबत अनेकदा अर्ज केले आहेत, तरी आपण दिलेल्या आदेशानुसार गावाच्या पाण्याची व्यवस्था होत नाही.
ही सर्व्हे योजना 30 वर्षे पुन्हा मिळणार नसल्यामुळे गावाचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. तरी चुकीच्या पद्धतीने केलेला सर्व्हे तत्काळ दुरुस्त करून फेरनिविदा करून गावाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी; अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
Nevasa : “वरखेड यात्रेत सुविधा उपलब्ध करून द्या”, मागणीसाठी मातंग समाजाचा तासभर रास्ता रोको
निवेदनावर माजी सरपंच बापूसाहेब कार्ले, सरपंच शहाजी गाडे, उपसरपंच रुपसुंदरा वटाणे, माजी सरपंच दत्तात्रय कार्ले, सदस्य वंदना कात्रजकर, अंकुश कात्रजकर, मंजूषा भोगले, मधुकर खरात आदींच्या सह्या आहेत.