नवी दिल्ली – महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेचे “धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह 2000 कोटी रुपयांना विकत घेतल्याचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या याचिकेमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स पाठवले आहे.
शिंदे गटाचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी ही अवमान याचिका दाखल केली आहे. संजय राऊत यांना भविष्यातही असे वक्तव्य करण्यास न्यायालयाने बंदी घालावी, अशी मागणीही राहुल रमेश शेवाळे यांनी याचिकेत केली आहे. मात्र, ही राजकीय बाब असून कोणत्याही आदेशाशिवाय अन्य पक्षाला आदेश देणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
सुनावणीदरम्यान शेवाळेंच्या वकिलाने सांगितले की, राऊत आणि इतरांनी निवडणूक आयोगासारख्या संस्थेवर आरोप केले आहेत. त्यावर न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगासारखी संस्था सर्व प्रकारची उत्तरे देण्यास सक्षम आहे.