नवी दिल्ली – देशात कारोनाबाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ सुरु आहे. गेल्या २४ तासांमध्ये नव्या बाधितांच्या संख्येने ४ लाखांचा आकडा पार केलाय. गेल्या महिन्याभरातील नव्या बाधितांच्या संख्येतील वाढ पाहता करोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी पुन्हा एकदा देशव्यापी लॉक डाऊन करावा लागेल अशी चर्चा सध्या सुरु आहे. करोना महासाथीशीसंबंधित तज्ज्ञांनी व टास्क फोर्सने देखील केंद्र सरकारला यापूर्वीच देशव्यापी लॉकडाऊनचा पर्याय सुचवला होता. अशातच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाउनचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निती आयोगाचे सदस्य व टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल यांनी काल (बुधवारी) पत्रकार परिषदेदरम्यान लॉकडाउनच्या पर्यायावर चर्चा सुरु असल्याची माहिती दिली.
काय म्हणाले व्ही के पॉल
” पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून अधिक आणि आयसीयू बेड्स ६० टक्क्यांहून अधिक वापरात असणाऱ्या राज्यांना यापूर्वीच नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अजून काही निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर त्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो आणि गरजेप्रमाणे ते निर्णय घेतले जातील,”
दरम्यान, देशात करोना महासाथ थैमान घालत असल्याने सध्या अनेक राज्यांनी लॉकडाऊन तसेच कडक निर्बंधांचा मार्ग अवलंबला आहे. करोना महासाथीच्या या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवायचे असल्यास लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचा सल्ला अनेक राजकीय नेते व साथ नियंत्रणसंबंधीचे तज्ज्ञ देताना दिसतायेत.