मुंबई – कंगना विरुद्ध शिवसेना वाद आता चांगलाच चिघळला आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या बीएमसीकडून आज कंगनाच्या कार्यालयावर अनाधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली. यानंतर संतप्त झालेल्या कंगनाने शिवसेनेचा उल्लेख बाबरी सेना असा केला. अशातच आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगनाला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी याबाबतचे वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात, ‘बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय सांगत आहेस? वास्तविक कंगना रणौतशी माझं काही वैर नाही. ती कलाकार आहे, मुंबईत राहते.परंतु ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे. ती सहन करण्यासारखी नाही. कंगनानं जर आपलं म्हणणं मागे घेतलं, तर वाद राहणारच नाही,’
महापालिकेच्या कारवाईबाबत म्हणाले…
यावेळी बोलताना राऊत यांनी कंगनाची कार्यालयावर झालेल्या कारवाईबाबत देखील वक्तव्य केले. ते म्हणाले, “करण्यात आलेल्या कारवाईचं उत्तर फक्त महापालिका आयुक्तच देऊ शकतात. जर कुणी कायदा तोडत असेल, त्याच्यावर कारवाई केली जाते. अशावेळी पक्षाकडे माहिती असावी हे गरजेचं नाही.”
शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया
कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईला विरोध दर्शविताना पवार यांनी, ‘कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई करत तिला बोलण्यासाठी अनावश्यक संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल. प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये’ अशी भूमिका मांडली होती.
याबाबत बोलताना राऊत यांनी, “शरद पवार यांनी काय म्हटलं आहे, याबद्दल मला माहिती नाही. माझ्यासाठी अभिनेत्रीसोबतचा वाद संपला आहे. विधानसभेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. गृहमंत्र्यांनीही याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कायदा काम करत असताना माझं बोलणं बरोबर नाही,”