Sanjay Raut – ठाकरे गटाकडून शिवसेना आणि भाजपा २०१९ साली वेगळे झाल्यानंतर बाबरी पाडण्यात आमचाच हात होता, यावरून श्रेयवाद दिसून आला. अशात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी पडली असावी किंवा बाबरी पडली तेव्हा ते शाळेत होते, असे आरोप उबाठा गटाकडून सातत्याने करण्यात येत होते.
त्यांच्या या आरोपावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत उत्तर दिले आहे. जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले.’ असं म्हणत आज सकाळी आपल्या एक्स अकाऊंटवर कारसेवा करतानाचा असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अत्यंत हास्यास्पद आणि पोरखट प्रश्न आहे. अयोध्येतील लढ्यात शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारणे कोत्या आणि संकोचित मनोवृत्तीचं लक्षण आहे. अयोध्येतील कारसेवकांचा नाशिकमध्ये सत्कार आणि सन्मान करणार आहोत.’
ते पुढे म्हणाले,’शिवसेनेच्या सहभागाविषयी ‘डेमोक्रोसी क्लब’ला प्रदर्शन भरवलं आहे. पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया आणि न्यायालयात हजर राहिलेले पुरावे आमच्याकडे आहेत. तुम्हाला पुरावा देण्याची गरज नाही. तुम्ही कोण आहात? तुमचे लोक पळून गेले होते. शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीची जबाबदारी घेतली. तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? आपण सगळे नागपूर स्टेशनला फिरण्यासाठी गेला असाल. पण, आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरीच्या घुमटावरील फोटो आहेत,” असंही राऊतांनी म्हटलं.