पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उन्हाळ्याला सुरुवात झाली, की घरोघरी महिलांची पापड करण्याची लगबग सुरू होत असते. याच काळात नवीन मूगडाळ, तूरडाळ व उडीद डाळ बाजारात आल्या आहेत. नेहमी नवीन डाळ बाजारात आल्यानंतर त्यांच्या भावात घट होत असते. यंदाचे चित्र मात्र वेगळेच दिसत आहे.
नवीन डाळींची आवक होऊनही दर कमी होण्याऐवजी वाढले आहेत. यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका डाळींच्या उत्पादनावर होऊन उत्पन्न घटले आहे. परिणामी, डाळींचे भाव वाढले आहेत. हरभरा डाळ व मसूर डाळ वगळता सर्व डाळी सध्या शंभरीपार गेल्या आहेत. त्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळींचा समावेश आहे. त्यामुळे डाळींची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
उन्हाळ्यात नव्या डाळी येत असतात. विशेषत: मार्च महिन्यात नवीन डाळ बाजारात येत असते. त्यानुसार सध्या मूगडाळ, उडीदडाळ, तूरडाळ, हरभरा डाळ व मसूर डाळींची बाजारात आवक होत आहे. सध्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे भावात वाढ झाल्याचे दिसत आहे.
आयात सुरू राहिली तर भाव स्थिर
यंदा विशेषत: तूर, उडीद, मूग, हरभरा डाळींचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे यंदा डाळीचे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. परदेशातून डाळींची आयात सुरू राहिल्यास भाव स्थिर राहतील; अन्यथा डाळींचे भाव आणखी वाढतील, असेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
डाळीचे प्रकार घाऊक बाजारातील किलोचा भाव
तूर १५० ते १७०
हरभरा ७२ ते ८०
मसूर ७५ ते ८०
मूगडाळ ११० ते १३०
उडीद १२५ ते १३०
यंदा अवकाळी
पाऊस कमी असल्याचा फटका डाळीच्या पिंकाना बसला आहे. विशेषत मराठवाडा, विदर्भ भागाला डाळींच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, नवीन डाळींची आवक होऊनही डाळींच्या किमती वाढल्या आहेत. घाऊक बाजारात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. – नितीन नहार, डाळींचे व्यापारी, मार्केट् यार्ड