मंचर, (प्रतिनिधी) – हिरडा पिकाची भरपाई मिळावी, यासाठी किसान सभेने सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार, दि. २० रोजी मंचर, ता. आंबेगाव येथील पुणे नाशिक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली.
हिरड्याची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी गेल्या साडेतीन वर्षापासून किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शासनाकडून हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवार, दि. १५ पासून सुरू करण्यात आले आहे.
आदिवासी भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी व आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे मंगळवार, दि. २० रोजी दुपारी १२ वाजता पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथील पिंपळगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहायचे आहे, असे आवाहन स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले आहे.