अजय माळवे
फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे फलटणमध्ये “उत्सव आनंदाचा, चैतन्याचा, स्फूर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठलभक्तीचा’ असे वातावरण निर्माण झाले आहे. अवघे शहर माउलीमय झाले आहे.
पंढरीस जाऊ। रखुमादेवी वरा पाहू।।
डोळे निवतील कान। मना तेथे समाधान।।
संता महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी।।
ते तीर्थांचे माहेर। सर्व सुखांचे भांडार।।
जन्म नाही रे आणिक। तुका म्हणे माझी भाक।।
तुकोबारायांच्या अभंगातील या ओळींप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने, “ज्ञानोबा माउली, तुकाराम….तुकाराम’ आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा, महानुभाव आणि जैन पंथीयांची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फलटणनगरीत बुधवारी मुक्कामासाठी विसावला.
तरडगाव येथील पालखीतळावरुन सकाळी 6 वाजता सोहळ्याने प्रस्थाना ठेवले. सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवण आणि वडजल येथे विसावा घेऊ, मार्गावरील गावोगावी स्वागत स्वीकारून, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठलभक्तांसमवेत सायंकाळी 6 वाजता फलटणमध्ये दाखल झाला. शहराच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी संजय गायकवाड व मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले.
माउलींचा सोहळा मलठण, सद्गुरू हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौकमार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आल्यानंतर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सोहळाप्रमुख विकास ढगे-पाटील व मान्यवरांनी स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाकामार्गे विमानतळावर मुक्कामासाठी विसावला. लाखो वारकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. आरतीनंतर माउलींच्या दर्शनासाठी फलटणरांनी रांगा लावल्या होत्या. राम मंदिर व जबरेश्वर मंदिर येथेही दर्शनासाठी वारकरी व महिलांनी रांगा लावल्या होत्या. पालखीचा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे उद्या, दि. 22 रोजी होणार आहे.