पुरोगामी महाराष्ट्रात वैयक्तिक स्वरूपाची टीका अयोग्य
सातारा – “ज्याप्रमाणे मुख्यमंत्री संविधानिक पदाचा सन्मान आहे, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिपदाचीसुद्धा उंची आहे. पुरोगामी महाराष्ट्रात वैयक्तिक स्वरूपाची टीकाटीपणी करणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील नारायण राणे हे जबाबदार नेते असून त्यांचा सन्मान राखला जावा. राणे मंत्री झाले हे शिवसेनेला आवडले नाही. त्या सूडबुध्दीतूनच ही कारवाई झाली,” अशी परखड टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पाटण व जावळी तालुक्यांतील पूरग्रस्तांना मदत देण्याच्या पाठपुराव्याकरिता रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडीचे किशोर गालफाडे उपस्थित होते.
आठवले म्हणाले, “जसा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जातो, तसाच केंद्रीय मंत्र्यांचा सन्मान केला पाहिजे. नारायण राणे मूळचे कडवट शिवसैनिक. त्यांची कडक भाषा असणारच. परंतु, त्यांनी नेमके काय बोलले ते ऐका. राणे कोणालाही भित नाहीत. ठाकरे यांनी सत्तेचा गैरउपयोग करत राणेंवर सुडबुद्दीने कारवाई केली आहे, असे आठवले यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कितीही कोणीही कटकारस्थाने रचली. तरीही 2024 मध्ये सत्ता भाजप- रिपाइंचीच येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
आठवले म्हणाले, “मध्यंतरी अतिवृष्टीने नुकसान झाले. तेथील लोकांना पक्की घरे म्हाडाच्यावतीने बांधण्यासाठी एक दोन वर्ष लागतील. तोपर्यंत चांगली तात्पुरती घरे राज्य शासनाने द्यावीत. लवकर पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्यावतीने करत आहोत. नुकतीच महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणसाठी झालेल्या बैठकीला रिपाइंला बोलवले नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनामुळेच भीमसेना आणि शिवसेना एकत्र आली. राज्यासह देशात रिपाइंची ताकद आहे. जावळी तालुक्यात, भंडारा जिल्ह्यात रिपाइंने ग्रामपंचायत निवडून आणल्या आहेत. रिपाइंला त्या बैठकीला बोलवले गेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठा समाज क्षत्रिय समाज, लढवय्या समाज आहे. काळाच्या ओघात बदल झाला असून या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका रिपाइंची आहे.’
टोलमाफीसाठी रिपाइं आंदोलन छेडणार
महामार्गावर असलेल्या टोलनाक्यावर पुण्याच्या धर्तीवर सातारा जिह्यातील नागरिकांना टोलमाफी झाली पाहिजे. एम एच 11, 50 वाहनांना टोलमाफी मिळावी, जो पर्यंत टोलमाफी केली जात नाही तोपर्यंत रिपाइं आंदोलन मागे घेणार नाही. टोलमाफीचे आंदोलन रिपाइंच्यावतीने सुरु राहिल, असे त्यांनी जाहीर केले.