पुणे –राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी “एमएचटी-सीईटी’चा निर्णय येत्या आठवडाभरात घेतला जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे या सीईटीसाठी विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीची प्रक्रिया राबविली जाते. या सीईटीसाठी जवळपास 6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सीईटी झाल्याशिवाय प्रत्यक्ष महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रिया सुरू होणार नाही. त्यामुळे सीईटीच्या अद्यापही तारखा जाहीर न झाल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.