सातारा -बगलबच्यांच्या नावावर हजारो एकर जमिनी खरेदी करून त्यातून मलिदा छापायचा म्हणूनच म्हसवड एमआयडीसी स्थलांतरित झाल्याची आवई उठवली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हसवड एमआयडीसीच्या स्थलांतरणाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रामराजे आता उतारवयात स्वतःची फजिती करून घेऊ नये, अतिताणामुळे त्यांच्या बुद्धीवर परिणाम झाला आहे, असा ोला माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.
दिल्ली- बंगळुरू कॉरिडोरच्या निमित्ताने विकसित होऊ घातलेल्या एमआयडीसीच्या प्रश्नावरून सध्या जिल्ह्यात राजकीय रणकंदन सुरू आहे. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांनी कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेतली. गोरे म्हणाले, “”म्हसवड येथे एमआयडीसी मंजूर झाली असून त्याच्या अध्यादेशाद्वारे जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
असे असताना नांदवळ, पिंपोडे येथे ही एमआयडीसी नेण्याचा घाट काही जणांनी घातला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भामध्ये हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची एमआयडीसीसाठी जमीन हस्तांतरण करण्याची कोणतीही तयारी नाही. जमीन अधिग्रहणाच्या नियमानुसार 70 टक्के शेतकऱ्यांनी जमीन हस्तांतरणाला परवानगी दिली तरच एमआयडीसी होऊ शकते. उलट येथीलच शेतकऱ्यांनी मला फोन करून यासंदर्भात मदत करण्यासाठी आवाहन केले आणि मी ठामपणे या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कोरेगाव तालुक्यातील एक इंचसुद्धा जमीन एमआयडीसीसाठी जाऊ देणार नाही. म्हसवड एमआयडीसी आहे त्याच ठिकाणी होणार. शासकीय अध्यादेश आणि जमीन अधिग्रहण यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाल्याने संबंधितांची पोटदुखी वाढली असून त्यांनी म्हसवड एमआयडीसी स्थलांतरित झाल्याची आवई उठवली आहे.”
म्हसवड एमआयडीसी प्रस्तावित जागीच होणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, औद्योगिक केंद्रीय समितीला रामराजे नाईक निंबाळकर व तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. म्हसवड एमआयडीसीमध्ये जागा, पाणी, रस्ते यांच्या प्रचंड त्रुटी असल्याचे सांगून त्यांनी समितीची दिशाभूल केली.
शेखर सिंह आयएएस दर्जाचे अधिकारी असून त्यांना अशी खोटी माहिती देणे शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली. म्हसवड एमआयडीसीच्या मध्यावरून महामार्ग जात असताना आणि तेथे जिहे कटापूरचे पाणी पोहोचलेले असताना रामराजे यांनी विनाकारण खोटा प्रचार केला. त्यांनी उतारवयात फजिती होऊन देऊ नये, जिल्ह्याला आपण भरपूर त्रास दिला. आता यापुढे आपल्याला सोसायची जिल्ह्याची अजिबात तयारी नाही, असा टोला गोरे यांनी लगावला.