मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण देणे असा त्याचा अर्थ होत नाही. संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही. ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना आरक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. छगन भुजबळ हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे. सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी अजिबात नसून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यातील वाद मिटवावा तसेच मराठा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
2024 च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा आमचाच विजय होईल. मतदार जनता त्यांच्या बाजूने गेले तरच आम्ही हरू शकतो. मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमचा हरण्याचा प्रश्नच येत नाही असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. वंचित आणि ठाकरे गटाच्या फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू, असे ते म्हणाले. आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहित नाही मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर ती महाविकास आघाडी सोबत करावी लागेल ठाकरेंसोबत नाही. त्यांचा जो 12- 12 चा फॉर्म्युला ठरला आहे तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.