विश्रांतवाडी, दि. 11 (प्रतिनिधी) – माजी नगरसेवक सतिश म्हस्के व यशदा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिनाक्षी म्हस्के यांच्या पुढाकाराने मित्र परिवारातर्फे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, शूरवीर सैनिकांना राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.
गेल्या 15 वर्षांपासून सतिश म्हस्के हे नाविन्यपूर्ण पद्धतीने रक्षाबंधनाचा उपक्रम राबवित आहेत. यंदा या उपक्रमाद्वारे कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेचे कार्य करणारे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील व येरवडा वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी, कर्मचारी, ग्रेफ सेंटर्समधील जवान यांना राख्या बांधण्यात आल्या. कळस, विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर परिसरात महिलांच्या हस्ते सुमारे दीड हजार जणांना राख्या बांधण्यात आल्या. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, ग्रेफ सेंटर्सचे डेप्युटी कमांडंट पटनायक यांनी या उपक्रमाबाबत कौतुक केले.