राजगुरुनगर – राजगुरुनगर शहरात कापड विक्री दुकानांमध्ये मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. एवढेच नव्हे तर येथे येणाऱ्या ग्राहकांची वाहने दुकानांसमोरच पार्किंग केली जात असल्याने शहरातील वाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. लॉकडाऊन असेपर्यंत कापड दुकानदारीवर प्रशासनाने कडक बंधने लादण्याची मागणी जनसामान्यांकडून होत आहे.
लॉकडाऊन 3.0च्या टप्प्यात काही प्रमाणात शिथीलता दिल्याने राजगुरुनगर शहरात विविध व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यातही कापड दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. विशेष म्हणजे अशा झुंबड उडालेल्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी कोणत्याही दुकानदारांकडे पार्किंगची व्यवस्था नाही.
येथे येणारे सर्व ग्राहक रस्त्याच्या कडेला जमेल तिथे वाहन पार्किंग करून तासन्तास कापड खरेदीमध्ये गुंतलेले असतात. परिणामी शहरांतर्गत रस्त्यावर दिवसभर कोंडी होत आहे. पोलिसांनी या दुकानदारांना पार्किंगबाबत समज द्यावी आणि रस्त्यावर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगला आळा घालावा अशी मागणी शहरातून होत आहे.