मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन काल जल्लोषात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायथन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण पाहता राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजी केली. मात्र 22 मार्चला आपण सविस्तर बोलणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, वर्धापनदिनाचे औचित्य साधत राज ठाकरेंनी पुतळ्यांच्या मुद्द्यांवर हात घालत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचे केवळ पुतळे उभारून काय होणार आहे? नाक्यानाक्यावर, प्रत्येक चौकात शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून काय साध्य होणार आहे?
अशाप्रकारे महापुरुषांचे पुतळे उभारून आपल्या हाती काहीही लागणार नाही… आपण फक्त जयंती आणि पुण्यतिथीला या पुतळ्यांना हार घालून मोकळे होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर काय बोलून गेले, त्यांचे विचार काय होते, याचं आत्मचिंतन केलं तर महाराष्ट्राचं काही खरं नाही’. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
सत्तेत येण्याची ठाकरेंकडून ग्वाही…
जनता सध्याच्या राजकीय तमाशांना विटलेली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा महानगर पालिका निवडणुका लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार असा विश्वास राज ठाकरेंनी वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केला. तसेच आता जास्त काही न बोलता 22 मार्चच्या गुडी पाडवा मेळाव्यात बोलणार असल्याची आठवण देखील यावेळी राज ठाकरेंनी करून दिली.