अमरावती – येथे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चर्चेचा विषय बनला आहे. महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच बसवणार असल्याचं लोकसभा खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे. दरम्यान शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच उभारा असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.
‘जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच पुतळा उभारा. पुतळा उभा केल्यानंतर त्याची सुरक्षितता महत्वाची आहे.’ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे. शिवजयंती साजरी करताना नियमांचं उल्लंघन करु नये असं आवाहन वळसे-पाटील यांनी केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘शिवाजी महाराजांवरील प्रेम मी समजू शकतो.
मात्र जे नियम घालण्यात आले आहेत त्यांचं पालन करावं. कोरोनाशी लढताना केंद्र सरकारकडून बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ हिंदूंना टार्गेट करण्यात येतं आहे, हे म्हणण चुकीचं आहे. समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम होत आहे.’
महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच : राणा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच बसवणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी ठासून सांगितलं आहे. कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही महाराजांचा पुतळा शिवजयंतीच्या आधी स्थापन होईल असा इशाराच नवनीत राणा यांनी दिला आहे.