पुणे – सुमारे महिनाभराची उसंत घेत, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे दुधडी भरुन वाहणाऱ्या नद्यांमुळे काठालगतच्या सर्वच पिकांना धोका निर्माण झाल्या असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांचीदेखील चिंता वाढली आहे.
ऑगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधील जनजीवन ठप्प झाले होते. या तीनही जिल्ह्यांमधील हजारो एकर जमिनीवरील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे या पश्चिम पट्ट्यातील ऊस कारखानदारीलादेखील मोठा हादरा बसला आहे. या भागातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता कुठे पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या संपामुळे हे कामदेखील संथगतीने सुरू होते.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांची पात्रे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका वाढवित आहेत. अनेक ठिकाणी पुनर्वसनासाठी मदत कार्य सुरू असतानाच नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत.