पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, ही चारही धरणे 100 टक्के भरली आहेत. तर शुक्रवारी रात्री खडकवासला धरणातून सुरू मुठा नदीत सोडण्यात आलेला 13 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग शनिवारी दुपार नंतर कमी करण्यात आला असून धरणातून 5 हजार 992 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून या खडकवासला,पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू होता. त्यामुळे ही चारही धरणे 100 टक्के भरल्याने धरणांमधून मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री पर्यंत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू होता. मात्र, शनिवार सकाळ पासून पाऊस जवळपास थांबलाच असल्याचे चित्र आहे.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच पर्यंत खडकवासला धरणात 1 मिमी, पानशेत 3 मिमी, वरसगाव 4 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ही चारही धरणे 100 ट्क्के भरलेली असल्याने पानशेत मधून 1954 क्यूसेक, वरसगाव धरणातून 2346 क्यूसेक, तर टेमघर धरणातून 450 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर हे सर्व सोडलेले पाणी खडकवासला धरणात येत असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत 5992 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.
नऊ दिवसात साडे आठ टीएमसी पाणी सोडले
जुलै महिन्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले होते तर इतर धरणे 70 टक्के भरलेली होती. त्यामुळे खडकवासला धरणातून सुमारे 3.34 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने खडकवासलासह या धरणसाखळीमधील इतर तीनही धरणे 100 टक्के भरल्याने खडकवासला धरणातून 11 ऑगस्टपासून पुन्हा मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. हे पाणी गेल्या नऊ दिवसांपासून सलग सोडले जात असून गेल्या नऊ दिवसात तब्बल 8.48 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. तर यंदाच्या पावसाळयात आता पर्यंत 11.82 टीएमसी सोडण्यात आले असून हे पाणी या धरणसाखळी मधील सर्वाधिक क्षमता असलेल्या वरसगाव धरणाच्या पाणीसाठया एवढे आहे.