पुणे, (संजय कडू) – जन्मत: कोणीही गुन्हेगार नसतो. पण परिस्थिती त्याला गुन्हेगारीकडे वळवते…लहान मुले गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता असते, ती अंकुश नसल्यानेच. त्यामुळेच घरातून पळून आलेल्या मुलांना जपणे आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करणे ही जोखीमच असते. अशी जोखीम पत्करत गेल्या काही वर्षांत अक्षरश: हजारो मुले त्यांच्या आई-बाबांकडे पोहोचवण्याचे सत्कार्य पुणे रेल्वे पोलीस करत आहेत. हे कार्यही “नाही चीरा नाही पणती…’ या उक्तीप्रमाणे “थॅंकलेसच…’ तरीही हा कर्मयज्ञ रेल्वे पोलीस पार पाडत आहेत. रेल्वे पोलीस अपर अधीक्षक कविता नेरकर-पवार त्यासाठी आईच्या ममतेने आग्रही आहेत.
घरातून पळालेली मुले मुळात धाडसी असतात. त्यांच्यावर अंकुश नसेल आणि त्यांचा ताबा जर गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडे गेला तर… कल्पनाही करवत नाही, इतके त्यांचे आयुष्य बरबाद होऊ शकते आणि समजाला निर्माण होणारा त्रास तो वेगळाच… याच भूमिकेतून केंद्र सरकारकडून “ऑपरेशन मुस्कान’सारखी मोहीम राबवली जाते. पण, मोहिमेपुरतेच त्याची दखल न घेता नेरकर-पवार यांनी आपल्या कारकिर्दीत ही जबाबदारी एका व्रताप्रमाणे सांभाळली आहे.
घरातून पळून आलेली ही मुले पुणे रेल्वे स्थानकावर येतात. ती साधारणत: 13 ते 15 वयोगटातील असतात. चित्रपटांचा प्रभाव, शहराचे आकर्षण, आई-वडिलांचा ओरडा, नोकरी-गरिबीमुळे आणि प्रेमप्रकरणातून हे लहानगे शहराच्या दिशेने येतात. मात्र, लहान गावांतील असल्याने ती रेल्वे स्थानकाच्या गर्दीमुळे गांगरतात. अशा मुलांना सोबत कोणी आहे का? याची चौकशी करुन ताब्यात घेतात. त्यानंतर त्यांचा पालकांचा शोध सुरू होतो.
गर्दुल्यांचा सर्वाधिक धोका
भटकणाऱ्या मुलांना सर्वाधिक धोका गर्दुल्यांपासून असतो. रेल्वे स्थानक परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात गर्दुले असतात. पोलिसांचा वावर असल्याने ते ट्रॅक किंवा बाहेरील पदपथावर आणि आडबाजूला वावरतात. अल्पवयीन मुले दिसली, तर ते त्यांना सावज बनवण्याची भीती असते. गर्दुल्यांकडून अत्याचार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
उत्तरप्रदेश आणि बिहारमधील मुले सर्वाधिक
या मुलांमध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमधून आलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रेल्वे पोलिसांनी उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, आसाम आणि अगदी नेपाळमध्ये जाऊनही मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. विदर्भ आणि मराठवाड्यातूनही पळून येणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. बहुतांश मुले पोट भरण्यासाठी आलेली असतात. मात्र, काम न मिळाल्याने ती पुन्हा रेल्वे स्थानकावरच भटकतात.
दोन वर्षांत संख्या घटली
करोनाच्या साथीमुळे 2020 आणि 2021 मध्ये रेल्वेसेवा बंद होती. लांब पल्ल्याच्या ट्रेन्स अनेक महिने बंद होत्या. यामुळे रेल्वे स्थानकावर बेवारस सापडणाऱ्या मुलांची संख्या कमालीची घटली आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या 7 प्लॅटफॉर्मस्वर दररोज एक ते दीड लाख प्रवाशांचा वावर असतो. गस्तीदरम्यान पोलिसांचे फलाटावरील अशा मुलांकडे लक्ष असते. वर्षाला सरासरी
500 ते 700 बेवारस मुले सापडतात. या सर्व मुलांचे समुपदेशन करण्यापासून त्यांना पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी आमचा महिला कक्ष कार्यरत असतो. काही सामाजिक संस्थाही आम्हांला मदत करतात. पोलिसांच्या दक्ष नजरेमुळे ही मुले चुकीच्या प्रवृत्तींच्या हातात जाण्यापासून वाचतात. मुलांची सुरक्षा ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे.
– कविता नेरकर-पवार,
अपर पोलीस अधीक्षक, रेल्वे
घरी पाठविण्याची प्रक्रिया
मूल बेपत्ता झाल्यावर पालक पोलिसांमध्ये तक्रार करतात. त्यावरून अपहरणाचाही गुन्हा दाखल होतो. ही माहिती पोलीस “सीसीटीएनएस’ पोर्टलवर टाकतात. स्थानकावर सापडलेल्या मुलाला विश्वासात घेऊन त्याचे नाव-पत्ता काढून घेतले जाते. गुन्हा दाखल असेल, तर “सीसीटीएनएस’ प्रणालीवर त्याची संपूर्ण माहिती मिळते. या मुलांना सर्वप्रथम स्थानिक बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले जाते. ही समिती मुले ज्या राज्य किंवा जिल्ह्यातून आली आहेत, तेथील समितीशी संपर्क साधते. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून या मुलांना रेल्वे पोलीस त्यांच्या घरी पोहोचवतात.