नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या संबंधात 14 जानेवारी रोजी केलेल्या विधानाचा व्हिडीओ आज सोशल मिडीयात नेटीझन्सकडून दिवसभर फिरवला गेला. त्यात राहुल गांधी यांनी असे विधान केले होते की माझ्याकडून लिहून घ्या, हे कायदे सरकारला मागे घ्यावेच लागतील, आणि तो पर्यंत शेतकरी झुकणार नाहीत.
स्वत: राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरही हा व्हिडीओ शेअर केला आहे. आजच्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, देश के अन्नदाताने सत्याग्रहसे अहंकार का सर झुका दिया हेै, अन्याय के खिलाफ ये जीत मुबारक हो. सप्टेंबर मध्ये हे तीन कृषी कायदे देशात लागू करण्यात आले होते. त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केले होते त्याला पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता व संसदेतही त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्या संबंधात काढण्यात आलेल्या मोर्चांचेही नेतृत्व त्यांनी केले होते.