Bharat Jodo Nyay yatra : भारत जोडो यात्रेमुळे उत्साहित झालेला कॉंग्रेस पक्ष आता भारत जोडो न्याय यात्रेसाठी सज्ज झाला आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेच्या त्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आजपासून मणिपूरमधून सुरु झाला.मात्र महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस काँग्रेसचे अडथळे वाढताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेससाठी महत्वाची असणाऱ्या यात्रेला सुरुवात झाली तर दुसरीकडे काँग्रेसचे मात्तबर नेते मिलिंद देवरा हे शिंदे गटात (शिवसेना) सामील झाले.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव. काँग्रेसमधील प्रबळ नेते आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख.ठाकरेंनी दक्षिण मुंबईवर दावा सांगितल्याने मिलिंद देवरा नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. अशात आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत देवरा यांनी पक्षात प्रवेश केला.
देवरा हे आता शिंदेंना साथ देणार असल्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे देवरा यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. देवरा यांच्यानंतर आणखी काही नेते देखील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
अशी आहे देवरा यांची राजकीय कारकीर्द
मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील मुरली देवरा हे ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेस नेते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले. 15 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य म्हणून मिलिंद देवरांना ओळखलं जायचं. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध 10 हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देवरा पुन्हा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले. मिलिंद देवरा यांनी 2012 ते 2014 या काँग्रेस कार्यकाळात केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान आणि जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षही होते.
कसा असेल राहुल गांधींच्या यात्रेचा दुसरा टप्पा
भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून ६ हजार ७१३ किलोमीटर प्रवास करेल. बहुतांश प्रवास बसमधून होईल. यात्रेचे काही मार्गक्रमण पायीही असेल. ती यात्रा ११० जिल्हे आणि १०० लोकसभा मतदारसंघांमधून जाईल. यात्रेचा कालावधी ६७ दिवस इतका आहे. यात्रेची सांगता २० किंवा २१ मार्चला मुंबईत होईल. यात्रा सर्वांधिक ११ दिवस उत्तरप्रदेशात असेल.त्या राज्यातील वाराणसी, अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांमधूनही यात्रा जाणार आहे.