नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा चांगलाच गाजत असल्याचे पाहायाला मिळत आहे. दरम्यान त्यांनी लंडनमधील संसदेच्या सभागृहाच्या आवारात ब्रिटिश खासदारांशी संवाद साधला. हाऊस ऑफ कॉमन्सच्या ग्रँड कॉमेंट रूममध्ये, विरोधी पक्षाचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारतातील राजकारणाविषयी बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना चक्क मुस्लिम ब्रदरहुड बरोबर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लंडनस्थित थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये राहुल गांधींनी आरएसएसवर जोरदार टीका केली. भारतातील लोकशाही स्पर्धेचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. याला कारण आहे आरएसएस नावाची संघटना. ही एक कट्टरपंथी आणि फॅसिस्ट संघटना आहे. ज्याने भारतातील जवळपास सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. मुस्लीम ब्रदरहुडच्या धर्तीवर आरएसएसची बांधणी झाली आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, “काँग्रेस १० वर्षे सत्तेत होती. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी आमची सत्ता देशावर होती भाजपला असे वाटते की, ते देशावर अनेक वर्ष राज्य करतील. पण तसे नाही. भाजप कायमची सत्तेवर राहू शकत नाही,” असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भाषण करताना मोठा दावा केला होता. माझ्या फोनमध्ये पेगासस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर आले होते. फक्त माझ्याच नव्हे तर भारतातील इतर अनेक नेत्यांच्या फोनमध्येही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले होते. भारतात लोकशाही धोक्यात आहेत. अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. एवढंच नाही तर सरकारने सर्वच संस्थांवर ताबा घेतला आहे. माध्यम आणि कोर्टावरही सरकारने कब्जा केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.