ठाणे – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी अशी मागणी करणारा अर्ज केला आहे.
न्यायदंडाधिकारी जे व्ही पालीवाल यांनी मंगळवारी तक्रारदार, आणि संघाचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांना या अर्जाला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार आहे. 2014 मध्ये भिवंडी येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे संघाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असल्याचा दावा करीत कुंटे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता.
मंगळवारी आपल्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या अर्जात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आपण केरळमधील वायनाड मतदार संघातील खासदार असल्याने आपल्याला वारंवार मतदारसंघाला भेट द्यावी लागते, पक्षाच्या कामाला हजेरी लावावी लागते आणि सतत प्रवास करावा लागतो, त्यामुळे न्यायालयात हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
मंगळवारी तक्रारदार कुंटे यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनावणीस हजर राहण्यापासून सूट मिळावी, असा अर्जही दाखल केला, त्याला न्यायालयाने परवानगी दिली. या आधी स्वत: कुंटे यांनीच दोनदा या खटल्याला स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती. पण त्यांची मागणी फेटाळून लावत कोर्टाने त्यांना पंधराशे रूपयांचा दंड केला होता.