नांदेड – राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी ही यात्रा हजारो कार्यकर्त्यांसह पोहोचली आहे. महाराष्ट्रात आगमन करताना राहुल गांधींसह हजारो कार्यकर्त्यांनी हाती मशाली घेतली होती. देगलूर नाक्यावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा गुरुद्वाराच्या दिशेने जाणार आहे.
महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. बॅनर, झेंडे आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हाती घेत नागरिक यात्रेच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
क्रांति की मशाल के साथ, भारत जोड़ो यात्रा महाराष्ट्र में आ चुकी है।#BharatJodoYatra https://t.co/xAS5wXyzxR
— Maharashtra Congress Sevadal (@SevadalMH) November 7, 2022
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात 14 दिवस मुक्काम असणार आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली, ती श्रीनगर येथे संपणार आहे. 3500 किमीचा या यात्रेचा प्रवास आहे. कन्याकुमारी, तामिळनाडू, कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही पदयात्रा आता महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात पोहोचली आहे.
महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. काँग्रेस नेत्या रजनी पाटील, सुशिलकुमार शिंदे, जयराम रमेश, एच के पाटील, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण , भाई जगताप, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात आणि प्रमुख नेते या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, दररोज सकाळी 6 वाजता सेवा दलाच्या ध्वजवंदनानंतर ही यात्रा सुरु होते त्यानंतर सकाळी 6 ते 10.30 पर्यंत ही यात्रा 15 किलोमिटर अंतर पार करते. त्यानंतर सायंकाळी 4 ते 6.30 पर्यंत पुन्हा 10 किलोमीटर अंतर पार करण्यात येते. त्यानंतर एक काॅर्नर सभा होऊन मुक्काम केला जातो.