मुंबई -जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच येत्या काळात होत असलेल्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर कर्णधार, प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात असून, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीही उचलबांगडी अटळ असल्याचे मानले जात आहे.
2013 सालानंतर भारतीय संघ आयसीसीची एकही स्पर्धा जिंकू शकलेला नाही. यावेळी भारतीय संघ कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भारताच्या हाती निराशाच लागली. गतवर्षी भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले, तर यंदा ऑस्ट्रेलियासमोर आपल्या संघाने नांगी टाकली. जगातील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज अशी ख्याती असलेले द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना भारतीय संघ अशा पद्धतीने पराभूत होतो, याचेच आश्चर्य निवड समितीनेही व्यक्त केले आहे.
राहुल द्रविड यांचा बीसीसीआयशी असलेला करार यंदा भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंक स्पर्धेपर्यंतच आहे. मात्र, त्यापूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडीजला रवाना होणार आहे. या मालिकेनंतर लगेचच द्रविड यांना पदावरून हटवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासह सपोर्ट स्टाफमधीलही काही जणांना नारळ दिला जाणार आहे.
भारतीय संघ वेस्ट इंडीजवरून परतल्यावर गोलंदाजी प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक यांच्यासह सपोर्ट स्टाफबाबत चर्चा होणार आहे. एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा समोर असल्यामुळे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचे स्थान काय असेल यावरही विचार केला जाणार आहे.
विंडीज दौऱ्यानंतरच निर्णय
द्रविड यांची वैयक्तिक कारकीर्द व त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक म्हणून केलेले काम पाहता त्यांना केवळ इशारा देण्यात येणार आहे, असेही बोलले जात आहे. मात्र, बीसीसीआयमधील काही सदस्यांना त्यांच्या जागी नवा व आक्रमक प्रशिक्षक असणे जरुरीचे वाटत आहे. आता याबाबत या दौऱ्यानंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.