चार वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
रावणगाव – खडकी (ता. दौंड) येथे यंदा पांढऱ्या शुभ्र रब्बी ज्वारीचे पीक चांगलेच बहरले असून, सततच्या चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर यंदा बहरलेल्या ज्वारी पिकामुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे. यंदा सप्टेंबरअखेर झालेल्या दमदार पावसामुळे दौंड तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके जोमात आलेली पाहायला मिळत आहेत.
यावर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे दौंड तालुक्यातील रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली, मळद, तसेच इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. शिवाय उस लागवडीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पीक वाढीसाठी यंदा हवामानही अनुकूल असल्याने रब्बी ज्वारीची वाढ जोमात आहे. संपूर्ण दौंड तालुक्याबरोबरच इंदापूर, बारामती तालुक्यांतील काही गावांतूनही ज्वारीचे पीक जोमात असल्याचे चित्र आहे.
पोटऱ्यात असलेली ज्वारी निसवून कणसे बाहेर पडू लागल्याने आता ज्वारीचे दाणे खाण्यासाठी बहरलेल्या पिकात पाखरांचा वावर वाढत चालला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र, मजुरीचे दर गगनाला भिडल्यामुळे शिवाय शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
दौंडच्या या परिसरात पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा ही पिके देखील हिरवीगार व जोमदार आहेत. हरभरा फुलोऱ्यात आहे, तर ज्वारी हुरड्यात आली आहे. गव्हावरही कोवळ्या ओंब्या दिसू लागल्या आहेत. काही ठिकाणी गव्हाची पेरणी सुरू आहे.
शिवारांमधून पक्ष्यांचा वावर वाढला..
पिके फुलोऱ्यात आणि निसावून कणसांत येत असल्याने विविध पक्षी या पिकांवरील कणसांकडे आकर्षित होत कणसातील कोवळे दाणे टिपून आपली भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या दोन तीन वर्षानंतर यंदा कोवळे दाणे टिपायला मिळत असल्याने शिवारांमधून पक्ष्यांचा वावर वाढलेला असताना बहुतेकांकडून बुजगावण्यांसह विविध कल्पना वापरून शेतीतील पिकाचे राखण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.