नवी दिल्ली :- भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी बुधवारी सकाळी संसदेच्या आवारात भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त निदर्शने करीत कॉंग्रेसवर निशाणा साधला. ‘भ्रष्टाचार भारत छोडो,वंशवाद भारत छोडो,तुष्टीकरण भारत छोडो’ असे संदेश असलेले पोस्टर हातात घेत त्यांनी ही निदर्शने केली.
निशिकांत दुबे आणि रविशंकर प्रसाद यांसारख्या भाजप नेत्यांनी आज कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचा आणि घराणेशाहीच्या धोरणांचा आरोप करत जोरदार निशाणा साधला.
दुबे म्हणाले, “या 75 वर्षात कॉंग्रेस आणि त्यांच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या पक्षांनी देशाला भ्रष्टाचार, वंशवाद आणि तुष्टीकरणाची राजनीती या तीन गोष्टी दिल्या, त्यातून देशाचे नुकसान झाले. त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याची वेळ आली आहे असे आवाहन त्यांनी केले. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही कॉंग्रेसवर अशीच टीका केली.
भारत छोडो आंदोलनातील सहभागींना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधानांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुक्त भारताची हाक दिली. “भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली . गांधीजींच्या नेतृत्वाखाली या चळवळीने भारताला वसाहतवादी राजवटीतून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली,असे पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.
“आज भारत एका आवाजात म्हणत आहे: भ्रष्टाचार भारत छोडो.वंशवाद भारत छोडो. तुष्टीकरण भारत छोडो,” असेही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.