Financial Accidents: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतातील वित्तीय संस्थाही वेगात काम करत आहेत. अशा स्थितीत एखादा अपघात घडल्यानंतर जास्त बचावात्मक न राहता रिझर्व्ह बँकेसारख्या नियंत्रकांनी अशा अपघातावर वेगवान उपाययोजना करण्याची गरज आहे, असे आवाहन कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक (Uday Kotak Founder of Kotak Mahindra Bank) यांनी केले आहे.
एका कार्यक्रमात या संदर्भात बोलताना कोटक यांनी सांगितले की, भारत वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतामध्ये विविध संस्था वेगात काम करत आहेत. अशा परिस्थितीत एखादा अपघात होऊ शकतो किंवा कोणीतरी ठरवून एखादे चुकीचे काम करू शकतो. अशा परिस्थितीत याचा ताण सर्वच यंत्रणावर येण्याची आणि नकारात्मक वातावरण होण्याची शक्यता असते.
अशावेळी पूर्वीसारख्या चुका होतील असे समजून प्रतिसाद देण्यास उशीर करू नये असे कोटक यांनी सुचविले. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेवर कडक कारवाई गेल्या आठवड्यात केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता कोटक यांनी आपण एखाद्या संस्थेचे किंवा कंपनीचे नाव घेऊन काही बोलणार नाही असे सांगितले. मात्र याबाबत आपल्या सर्वापेक्षा रिझर्व्ह बँकेला जास्त माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारावर रिझर्व्ह बँक आवश्यक ती कारवाई करीत असेल असे त्यांनी सूचित केले.
करोना काळात वित्तीय स्थिरता आबाधीत राहावी यासाठी रिझर्व्ह बँकेने जे प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहेत. नादारी कायद्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कोटक म्हणाले की, हा कायदा कागदोपत्री चांगला आहे. मात्र या कायद्यांतर्गत जी प्रकरणे निवडण्यासाठी आली त्याचा निवाडा होण्यास आवश्यकतेपेक्षा जास्त कालावधी लागला. त्यामुळे कायदा चांगला आहे मात्र त्याची अंमलबजावणी वेगात व्हावी यासाठी आवश्यकता उपाय योजना करण्याची गरज त्यांनी सूचित केली.
भारतातील आर्थिक परिस्थिती वाढत आहे. त्याचबरोबर नागरिकांची आर्थिक साक्षरता वाढत आहे. बर्याच प्रमाणात वित्तीय उत्पादने वाढली आहेत. त्यामुळे नागरिक बचती ऐवजी या नव्या वित्तीय उत्पादनातून अधिक परतावा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत बचत करणार्यांचा देश राहिलेला नाही तर गुंतवणूक करणार्यांचा देश झाला आहे, या भूमिकेचा यावेळी कोटक यांनी पुनर्विचार केला.