नवी दिल्ली – इंग्लंडमधील बर्मिंघम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याच्या हॉकी इंडियाच्या निर्णयावर केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी हॉकी इंडियाने सरकारशी संवाद साधणे आवश्यक होते, अशा शब्दात ठाकूर यांनी ताशेरे ओढले आहेत.
स्पर्धा कोणतीही असो किंवा कोणत्याही खेळाची संघटना असो असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारशी सल्लामसलत करणे गरजेचे असते. हे साधे संकेतही हॉकी इंडियाने पाळले नाहीत.राष्ट्रकुलसारख्या मोठ्या स्पर्धेत एखाद्या संघटनेचा संघ सहभागी होत नसतो तर तो संघ देशाचे प्रतिनिधित्व करत असतो.
अशा स्पर्धेत केवळ 18 खेळाडू संघटनेचे नव्हे तर 130 कोटींच्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. हॉकी इंडियाने माघार घेण्याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी सरकार आणि क्रीडा विभागाशी सल्लामसलत केली पाहिजे, असेही ठाकूर यांनी नमूद केले.
हॉकी इंडिया राष्ट्रकुल महासंघाशीच नव्हे तर थेट सरकारला देखील अंधारात ठेवत आहे. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वर येथे होणाऱ्या कनिष्ठ हॉकी विश्वकरंडक स्पर्धेतून इंग्लंडने माघार घेतल्यानंतर लसीकरणाच्या राजकारणाने हॉकीच्या मैदानात प्रवेश केला. लगेच त्याला हॉकी इंडियाने चोख प्रत्युत्तर म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा केली.
दोघांनी त्यांच्या देशांतील सरकारकडून इतर देशांतील प्रवाशांवर 10-दिवसांचे विलगीकरण बंधनकारक असल्याचा कठोर नियम असल्याने माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, एका देशाने एक निर्णय घेतला म्हणून आपणही त्याला तशाच निर्णयाने उत्तर देणे योग्य नाही. अशा स्पर्धांमधून माघार घेतल्यामुळे अनेक खेळाडूंचेच नुकसान होत आहे, असेही ठाकूर म्हणाले.