नवी दिल्ली – ग्राहकाकडून खरेदी वाढू लागली आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आला असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर महिन्यामध्ये रिटेल विक्रीत 34 टक्के वाढ झाली असल्याचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये बरेच सण येत असल्यामुळे ग्राहकांनी खरेदी केली असावी. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या एकत्रित आकडेवारीचा विचार केल्यानंतर खरे चित्र समोर येईल असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले.
पश्चिम भारतातील रिटेल विक्रीत 23 टक्के, पूर्व भारतातील रिटेल विक्रीत 13 टक्के, उत्तर आणि दक्षिण भारतातील रिटेल विक्रीत 10 टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.दागीन्यांची विक्री वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे ते म्हणाले.
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेमध्ये या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दागिन्यांची विक्री 24 टक्क्यांनी वाढली आहे. तयार कपड्यांची खरेदी सहा टक्क्यांनी,धान्य आणि किराणा विक्री 31 टक्क्यांनी वाढली असल्याचे या संघटनेने केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतामध्ये 100 कोटी लस देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या आत्मविश्वासात वाढ होत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.