नवी दिल्ली – लॉक डाऊन संपुष्टात आल्यामुळे भारतातील विविध शहरातील रिटेल विक्री वेगाने पूर्वपदावर येत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये रिटेल विक्री गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर करोना पूर्व विक्रीपेक्षा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेली विक्री 6 टक्क्यांनी वाढली आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली असल्याचे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले. राजगोपालन म्हणाले की, आकडेवारी जरी उत्साहवर्धक असली तरी वाढलेल्या महागाईचा या आकडेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही क्षेत्रातील वाढ आणखी पूर्वपदावर आली नसण्याची शक्यता आहे.
राजगोपालन म्हणाले की, पश्चिम भारतातील विक्री नऊ टक्क्यांनी वाढली आहे. पूर्व भारतातील विक्री सहा टक्क्यांनी वाढली आहे. उत्तर भारतातील विक्री चार टक्क्यांनी वाढली आहे तर दक्षिण भारतातील विक्री पाच टक्क्यांनी वाढली आहे. पश्चिम भारतातील विक्री इतर भागापेक्षा वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
ते म्हणाले की, ग्राहक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची विक्री 31 टक्क्यांनी, अन्न आणि किराणाची विक्री ते 30 टक्क्यांनी वाढली आहे. कपडे आणि पादत्राणांची विक्रीही दहा टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
आता सर्व भारतातील आरोग्य विषयक परिस्थिती पूर्ववत झाल्यामुळे आगामी काळातही रिटेल विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये घाऊक आणि किरकोळ महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर रशिया- युक्रेन युद्धामुळेही विविध क्षेत्रांमध्ये अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा किरकोळ विक्रीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सूचित केले.