चंदीगड – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पंजाबमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर विरोधकांनी पंजाब सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असल्याची टीका केली आहे. सोमवारी केजरीवाल यांनी पंजाबमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. यावरूनच काँग्रेस व अकाली दलाने आम आदमी पक्षाला लक्ष्य केले आहे.
सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी राज्याचे मुख्य सचिव आणि सचिव हे देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीस मुख्यमंत्री मान उपस्थित नसल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
‘दिल्ली रिमोट कंट्रोल’चा पर्दाफाश’
“मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अनुपस्थितीत अरविंद केजरीवाल यांनी आयएएस अधिकार्यांना बोलावले. यामुळे पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून वावरत असलेल्या ‘दिल्ली रिमोट कंट्रोल’चा पर्दाफाश झाला आहे. हा संघराज्य प्रणालीचा भंग असून पंजाबी अभिमानाचा अपमान आहे. याबाबत दोघांनीही (केजरीवाल व मान) स्पष्टीकरण दिले पाहिजे.” अशी मागणी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा निशाणा
“ज्याची सर्वाधिक भीती होती तेच झालं. केजरीवाल यांनी अपेक्षेपेक्षा आधीच पंजाबचा ताबा घेतला आहे. भगवंत मान हे केवळ रबरी शिक्का असल्याचा निष्कर्ष फार पूर्वीच काढण्यात आला होता, आता खुद्द केजरीवाल यांनी बैठक घेऊन ते सिद्ध केले आहे.” अशी टीका माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली.
आम आदमी पक्षाचे स्पष्टीकरण
याबाबत बोलताना आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी, “अरविंद केजरीवाल हे आमचे नेते आहेत. आम्ही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो. जर पंजाबच्या हितासाठी काही पाऊले उचलली जात असतील, त्यासाठी काही अनौपचारिक बैठक बोलवण्यात आली असेल तर विरोधकांनी त्याला विरोध करत न बसता पाठिंबा द्यायला हवा.” अशी बाजू मांडली.