नवी दिल्ली: नांदेडवरून पंजाबला गेलेल्या भाविकांमुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंह सरकारची चिंता वाढली आहे. नांदेडवरून गेलेल्या 50 भाविकांना करोनाची लागण झाली आहे. हे करोना पॉझिटिव्ह रुग्ण पंजाबच्या 22 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये राहणारे आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये गुरुवारी करोनाचे 35 नवी प्रकरणं समोर आली. त्यामुळे पंजाबमधील करोनाबाधितांचा आकडा 357 वर पोहोचला आहे. यामधील 90 रुग्ण बरे झाले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पंजाबमध्ये करोनाचे 33 नवे रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण नांदेड येथील गुरुद्वारा येथून आले आहेत.
या भाविकांना नांदेड येथून पंजाबमध्ये आणताना दुर्लक्ष केले गेले. नांदेडवरून आणताना भाविकांची करोना तपासणी केली गेली नव्हती. तसेच एका बसमधून 40-40 भाविकांना आणण्यात आले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही. या भाविकांनी तब्बल 1800 किमी प्रवास एकत्रित केला आहे. एवढेच नव्हे, तर पंजाबमध्ये आल्यानंतरसुद्धा या भाविकांची करोना तपासणी करण्यात आली नाही. त्यांना तसेच त्यांच्या घरी पाठवण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात पंजाबमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन आहे. पंजाबमधील काही भाविक नांदेड येथील गुरुद्वारा हुजूर साहिब येथे दर्शनसाठी आले होते. लॉकडाऊनमुळे ते नांदेडमध्येच अडकले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना पुन्हा पंजाबमध्ये आणण्यात आले. सध्या ते आपापल्या घरी गेले आहेत. त्याशिवाय जैसलमेरमधील 3 हजार आणि राजस्थानच्या कोटा येथील 152 विद्यार्थ्यांनाही राज्यात परत आणण्यात आले आहे.