वानवडी – वानवडी येथील चौका-चौकामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. वाढते नागरिकरण आणि रस्ते अरूंद यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने दुचाकी चालक तसेच रिक्षावाले पदपथाचाही वापर रस्ता म्हणून करीत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे -सोलापूर महामार्गावर फातीमा नगर येथे अशी स्थिती सातत्याने निर्माण होत आहे. पदपथाचा वापर रस्ता म्हणून करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. वानवडी येथील फातीमानगर ते रामटेकडी रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, यामधून मार्ग काढताना वाहनचालक जागा दिसेल तेथून वाहन नेतात.
वानवडी बाजार व फातीमा नगर, हडपसरकडे जाण्यास हा मार्ग जवळचा असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ असते. रस्ता अरूंद असल्याने बस, अवजड वाहने यामुळे या टप्प्यात मोठी वाहतूक कोंडी होते. तसेच, या रस्त्यालगत अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. त्यामुळे अनेक वेळा ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदीसाठी जातात यामुळेही कोंडीत भर पडत आहे. या चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.