पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विद्यार्थी संवाद कार्यक्रम कार्यक्रम घेण्याचे नियोजन विविध विद्यार्थी संघटनांनी केले. मात्र, विद्यापीठाकडून कार्यक्रमाला परवानगीच नाकारण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाने परवानगी दिली नाही तरी कार्यक्रम घेण्यावर विद्यार्थी संघटना ठाम आहेत.
विद्यार्थ्यांना अनेकदा विविध समस्यांनाच सामोरे जावे लागते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, वसतिगृह, भोजनगृहाचा दर्जा, सुविधा, विविध शुल्क आकारणी यासह अन्य प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत. शिैक्षणिक अडीअडचणींबाबत चर्चेसाठी विद्यार्थी संघटनांतर्फे दि. 10 मे हे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कुलसचिवांना दि. 3 मे रोजी पत्रही देण्यात आले होते. पण, अजूनही उत्तर देण्यात आले नाही. कार्यक्रमाला एक दिवस बाकी असूनही परवानगी दिलेली नाही. याबाबत विचारणा केल्यावर “जी-20′ परिषदेसंदर्भातील कार्यक्रम विद्यापीठात होणार असल्याने परवानगी मिळणार नसल्याचे तोंडी सांगण्यात आले.
सतत वाद आणि वाद…
पुणे विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात आहे. यात रॅप सॉंगचे अनधिकृत चित्रिकरण, मुख्य इमारतीत झालेली तोडफोड तसेच विद्यार्थी संघटनांची वारंवार होणारी आंदोलने यामुळे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्र न राहता, राजकीय आखाडा झाला आहे. त्यातच आता नाना पटोले प्रकरणामुळे विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे.