पुणे – नागरिकांना धरण, धबधबा, तलाव आणि नदीचे आकर्षण असते. मात्र, अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली, अडथळे आपल्याला माहिती नसतात. यामुळे स्थानिक नागरिकांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण पाण्यात उतरलो, तर मृत्यूही ओढवण्याची शक्यता असते. पुणे जिल्ह्यात अशाच प्रकारे बुडून मागील पाच वर्षांत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक दुर्घटना पावसाळ्यातील आहेत.
खडकवासला धरण येथे पोहण्यासाठी उतरलेल्या शाळकरी मुली बुडाल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. पावसाळ्यात धरण, धबधबा, डोंगररांगा, गड-किल्ले, तलाव यांसह विविध ठिकाणी लोक वर्षाविहारासाठी जातात. तेथे खबरदारी न घेता पाण्यात उतरणे, धबधब्याखाली भिजण्याचा अतिउत्साह असतो. या क्षणभराच्या मजेत एखाद्याचा जीवदेखील जातो. यामागे मुख्य कारण म्हणजे पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे आणि फाजील आत्मविश्वास. अनेक पट्टीचे पोहणारेही अनोळखी ठिकाणी बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील जलतरण तलावात पोहण्याची सवय असेल तर तो व्यक्ती विहीर, धरण, तलाव आणि समुद्रात तीतक्या कुशलतेने पोहू शकत नाही. अनेक ठिकाणी पाण्यात भवरे असतात. शेवाळ जमा झालेले असते. याची माहिती स्थानिक नागरिकांना असते. अनोळखी ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात उतरणे आवश्यक आहे. समुद्र असो व धरण अनेक ठिकाणी प्रशासनाने धोक्याच्या सूचना लिहलेल्या असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
पर्यटनाच्या ठिकाणी दुर्घटना
पुणे जिल्ह्यात धरणांसह अन्य प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पानशेत, खडकवासला, चासकमान, डिंभे, भाटघर, उजनी, नीरा-देवघर अशी धरणे आहेत. सुटीदिवशी येथे गर्दी असते. पावसाळ्यात पर्यटकांचा ओढा असतो. पाणी दिसले, की तरुणाई उत्साहात असते. यामुळे अनेक दुर्घटना घडतात. भुशी डॅममध्ये पर्यटक वाहून गेल्याच्या घटना दरवर्षी घडतात.
काळजी घेणे आवश्यक..
धबधब्याकडे जाताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात.
जोरदार प्रवाहामुळे धबधब्याच्या वरच्या टोकावरून दगड निखळून पडण्याचा धोका असतो. त्यामुळे काळजी घ्यावी.
धरण आणि नदी परिसरात पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज घ्यावा. त्यामुळे स्थानिकांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.
दगड किंवा पायवाटांवरील शेवाळामुळे रस्ता निसरडा होतो. अशा ठिकाणी अंदाज घेऊनच पाऊल टाकावे.