पिंपरी – दापोडी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होणार असल्याच्या अफवा मागील तीन दिवसांपासून पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परंतु तूर्तास पुनर्वसनाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. याबाबत स्वतः नागरिकांशी संवाद साधून संभ्रम दूर करू, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दापोडी येथील एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीने एसआरए प्रकल्पाला दिवाळीत पणत्या लावून विरोध केला होता. नगरसेविका स्वाती काटे, राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड, गोपाळ मोरे, रवी कांबळे यांनी संघर्ष कृती समितीच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले व दापोडी येथील नागरिकांची घरे पाडून पुनर्वसन होणार असल्याचा महापालिका आयुक्तांचा लेखी आदेश आहे का? असा प्रश्न केला.
“तूर्तास आमच्या कार्यालयाकडून पुनर्वसनाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. याबाबत स्वतः नागरिकांशी संवाद साधून संभ्रम दूर करू,’ असे एसआरए मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.