पुणे –रत्नागिरीच्या नावावर कर्नाटक हापूस आंब्याची विक्री होत असल्याचे प्रकार अनेकदा घडतात. मात्र, बाजार समितीत अजब प्रकारच समोर आला आहे. कर्नाटक हापूस आहे, या संशयातून रत्नागिरी हापूस आंबा जप्त करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. शेतकऱ्याने विनंती करूनही त्याला दमदाटी करण्यात आली, असा आरोप केला जात आहे.
शेतकरी महादेव लक्ष्मण काळे यांनी दापोली येथून येथील बाजारात हापूस आंब्याच्या शंभर पेट्या विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु हा आंबा कर्नाटक आंबा असल्याचे म्हणत बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पेट्या ताब्यात घेतल्या. याविषयी शेतकरी काळे म्हणाले, “बाजार समितीचे साहेब म्हणतात की हा आंबा रत्नागिरीचा नसून कर्नाटकचा आहे. बाजारात येताना शंभर पेट्या आणल्या होत्या. त्यातील रात्री दोन पेट्या चोरीला गेल्या आहेत. 98 पेट्या शिल्लक आहेत. समितीचे लोक म्हणतात गाडी बाहेर लावायची. बाहेर गाडी लावली की बाहेरची लोक त्रास देतात. आत गाडी लावली की पार्किंगवाले लोक त्रास देतात. मार्केटमध्ये आले, की सगळीकडून पैसे मागितले जातात. दमदाटी करून पार्किंगचे पैसे घेतले जातात. तो दोन लाख रुपयांचा माल असून, खराब होण्याची भीती आहे.
बाजार समिती कर्मचारीही संभ्रमात
आंबा कोणत्या प्रजातीचा तपासण्यासाठी अनुभव नसणाऱ्या व्यक्तीलर बोलवण्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला. सुरुवातीला त्याने हा आंबा कर्नाटक हापूस आहे म्हणून सांगितले. शेतकऱ्याच्या पेट्या उचलून सेक्युरिटी केबिनला आणल्यानंतर त्यानेच हा आंबा कोकणातील हापूस आंबा असल्याचे सांगितले. त्यामुळे समितीचे कर्मचारीही संभ्रमात पडले.
तो खरेदीचा माल आहे. ती व्यक्ती व्यापारी आहे. तो नवीन असला तरी आडत्या जुना आहे. आडत्याने तो माल गाळ्यावर उतरवणे आवश्यक होते. शेतकरी असो किंवा व्यापारी, बाजार समितीच्या अधिकारी कर्मचारी यांचे वागणे-बोलणे नम्रतेचे असावे याबाबत सूचना देऊ. – मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.