पुणे – शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची भुरभुर सुरू झाली. उपनगरांत कोथरूड, धायरी, कात्रज, सिंहगड रोड, पाषाण, औंध याठिकाणी मध्यम ते जोरदार सरी झाल्या. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सध्या पुणेकर पावसाच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. मागील दीड महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झालाच नाही.
त्यात जून-जुलैमधील पावसामुळे पाणीसाठ्यात झालेली वाढही आता कमी होत आहे. त्यामुळे पाऊस झाला नाही तर पुढील परिस्थिती बिकट राहील. जिल्ह्यात काही भागांत पावसाअभावी शेतपिके जळाली आहे. तर काही शेतकरी विहीर, बोअरच्या पाण्यावर पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहील तर हलक्या सरी पडतील. कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ
गौरी-गणपतीचे आगमन काही तासांवर आले आहे. अशाच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस आल्याने रविवार पेठ, बुधवार पेठ, तुळशीबाग, मंडई याठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. त्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधून-मधून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. डेकोरेशनचे साहित्य किंवा किराणा साहित्य घेऊन जात असताता नागरिकांना पाऊस येताच आडोशाला थांबावे लागले.