पुणे – मान्सूनच्या आगमनाला उशीर होण्यासोबतच, यंदा पावसाने महिनाभर उशीराने हजेरी लावली असली तरी जुलै महिन्यात झालेल्या पावसाने महापालिकेने पाणीकपात मागे घेतल्याने शहरातील पाण्याच्या टॅंकरची मागणी दीड हजारांनी घटली आहे. त्यामुळे, पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ऐन जून महिन्यातही शहरात टॅंकरच्या सुमारे 35 हजार 216 फेऱ्या झाल्या होत्या. हा आकडा जुलै अखेरीस 33 हजार 613 पर्यंत खाली आला आहे. उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांना महापालिका दररोज 200 टॅंकरच्या फेऱ्या पाणी देते. या गावांसाठीची पाणी योजना पुर्ण झालेली असल्याने या गावांचे टॅंकर फेऱ्या बंद होतील.
पाण्याची मागणी घटली
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी साठ्यात पाण्याचा साठा कमी असल्याने महापालिकेने शहरात 18 मे पासून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने आधीच कपात आणि त्यात पाऊसही नसल्याने टॅंकरची मागणी वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून चांगला पाऊस झाल्याने तसेच धरणात चांगला पाणीसाठा वाढल्याने पालिकेने पाणीकपात रद्द केली.
तसेच, पाऊसही चांगला झाल्याने पाण्याची मागणीही घटली आहे. परिणामी, टॅंकरची मागणी घटली असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील टॅंकरची संख्या कमी झाली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यात, शिवाजीनगर, कोथरूड, मध्यवर्ती भागातील काही पेठा तसेच कात्रज-कोंढवा भागासह, पाणी बंद ठेवण्यात आल्यानंतर समस्या उद्भवणाऱ्या भागातील टॅंकरचा समावेश आहे.
टॅंकरची आकडेवारी
एप्रिल – 33 हजार 643
मे – 35 हजार 590
जून – 35 हजार 216
जुलै – 33 हजार 613