पुणे – सांडपाण्यातून नदीत जाणाऱ्या कचऱ्याला अटकाव करण्यासाठी “हायजिआ’ हा प्रकल्प शहरात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ओंकारेश्वर पूल आणि हडपसरच्या वैदूवाडी परिसरात प्रकल्प उभारण्यात आला असून एका महिन्याच्या आत 200 किलो पेक्षा अधिक घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून यशस्वीरित्या प्रतिबंधित करण्यात आला आहे.
शहरात मागील काही वर्षांपासून पूरसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. तर ड्रेनेजलाइनमधील मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या घनकचऱ्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून, गाळ साचल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. ऑस्ट्रेलियन शहर क्विनानाने ड्रेनेज सिस्टीममधून कचऱ्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. याच धर्तीवर आधारित प्रकल्प पुण्यात राबवण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका, इमरिस, पर्सिस्टंट सिस्टीम, वर्टेक्ससह ट्री इनोव्हेटीव्ह फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.
या प्रकल्पात 20 ते 30 टक्के घनकचरा नदीत जाण्यापासून प्रतिबंधित करण्याची क्षमता आहे, या उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील मुळा-मुठेला शुद्ध आणि सुशोभित करण्याचा मानस आहे.
आपल्याला स्वच्छ आणि निरोगी वातावरण हवे असल्यास सांडपाणी पाण्यामध्ये जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे गरज बनली आहे, असे फाउंडेशनचे कार्यकारी संचालक तन्वीर इनामदार यांनी सांगितले.